top of page

कॉलेजला गेली परत घरी आलीच नाही, पोलिसांना सापडला मृतदेह; दोन विद्यार्थिनींच्या आत्महत्येने नागपूर हादरलं

  • May 9
  • 1 min read

जनचेतना/नागपुर/यश रामटेके :- नागपूर शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील दोन वेगवेगळ्या भागांत दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनांनी नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. एका घटनेत अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तरुणीने फ्लायओव्हरवरून उडी घेत आपले जीवन संपवले, तर दुसऱ्या प्रकरणात दहावीतील विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.



पहिली घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. श्रीना गडपायले (वय १८) ही BE प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. ती कलमेश्वर रोडवरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. मात्र, सायंकाळपर्यंत ती घरी परतली नसल्याने कुटुंबीय चिंतेत होते.दरम्यान, रात्री उशिरा त्रिरपुडे रुग्णालयातून कुटुंबीयांना फोन आला. त्यामध्ये श्रीनाने कामठी रोडवरील व्हाईट हाऊसजवळील फ्लायओव्हरवरून उडी घेतल्याची माहिती देण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू ठेवले, मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला.


दुसरी घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रनगर परिसरात उघडकीस आली. सानवी येतखडे (वय १५) ही दहावीची विद्यार्थिनी होती. तिने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.या दोन्ही घटनांमुळे शहरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांमधील मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन्ही प्रकरणांत कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि परिचितांची चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे.



 
 
 

Comments


bottom of page